Saturday, October 16, 2010

एका सत्यवादीचे पत्र

कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर एमिरेटस असलेले, अमेरिकन विज्ञान-तंत्रज्ञान जगतात अनेक प्रकारे महत्त्वाच्या भूमिका बजावलेले प्रा. डॉ. हेरॉल्ड लुविस यांनी नुकताच अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र मोठे वाचनीय आहे. सध्याच्या मानवनिर्मित वातावरण बदल आणि जागतिक तापमानवृध्दीच्या सद्दीच्या काळात तथाकथित कन्सेन्ससचा बोलबाला एवढा असताना असले पत्र एखाद्या वैज्ञानिकाने लिहिले आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे मला महत्त्वाचे वाटते.
डॉ. लुविसचे पत्र विज्ञानाच्या सर्व पाईकांनाच नव्हे तर ज्ञान आणि सत्याशी निष्ठा असलेल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना मननीय वाटेल. त्या पत्राचा अनुवाद पुढे देत आहे.

- प्रिय कर्ट,

सदुसष्ट वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रथम अमेरिकन फिजिकल सोसायटीचा सदस्य झालो तेव्हा ती अगदी छोटीशी, सौम्य संघटना होती- तोपर्यंत पैशाच्या महापुरात न्हाऊन भ्रष्ट झालेली नव्हती. ड्वाईट आयझेन हॉवरने अर्धशतकापूर्वी आपल्याला या धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तर भौतिकशास्त्र हा विषय निवडून आयुष्याचा मार्गक्रम ठरवणे म्हणजे दारिद्र्याचा, सततच्या अभावाचा वसा घेतल्याचेच लक्षण ठरत होते. दुसऱ्या महायुध्दानंतर हे सारे बदलले. त्यानंतर चांगले उपजीविकेचे साधन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून अनेकजण भौतिकशास्त्राच्या अभ्यासात शिरले. अगदी अलिकडे, म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी विज्ञान आणि समाजातील एक सामाईक चिंतेचा विषय म्हणून अणुभट्टीच्या सुरक्षा अभ्यासासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो तेव्हाही, बाहेर या विषयावरून झोंडगिरी करणारे अनेक लोक होते, पण आम्हा भौतिकशास्त्रज्ञांवर प्रमाणाबाहेर दबाव पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचे वैज्ञानिक निकषांवर प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आम्हाला शक्य झाले. आमच्या कामात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालेच तर ते तपासून पहायला आणखी एक ओव्हरसाइट कमिटी होती. त्यात असलेले पिएफ पानोफ्स्की, व्हिकी वाइसकॉफ, आणि हॅन्स बेथ यांच्यासारखे उत्तुंग भौतिकशास्त्रज्ञ आमच्या कामात सहाय्यभूत होते. एका भारलेल्या वातावरणात आम्ही जे काम पार पाडले त्याचा मला अतिशय अभिमान वाटला होता. एपीएसच्या अध्यक्षांना दिलेल्या अहवालात ओव्हरसाइट कमिटीने आम्ही ज्या स्वतंत्र बाण्याने काम केले त्याची नोंद घेतली होती. या अहवालावर दोन्ही बाजूंकडून टीका होईल असेही त्यांनी म्हटले होते. यापेक्षा मोठा गौरव कोणता असणार?
आज किती वेगळे चित्र दिसते आहे. असे उत्तुंग मानव या पृथ्वीवर वावरतच नाहीत, आणि पैशाचा महापूर हेच साऱ्या भौतिक-संशोधनाचे, इतर अनेक गोष्टींचे आणि अनगिनत व्यावसायिक नोकऱ्यांचे उगमस्थान ठरते आहे. मी माझी कारणे स्पष्ट करतोच आहे, त्या कारणांमुळे एपीएसचा फेलो असण्यातला माझा इतके वर्षांचा अभिमान आता गळून जाऊन त्याची जागा शरमेने घेतली आहे. मला यात यत्किंचितही आनंद नाही, पण आणि मला या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुझ्याकडे पाठवून देणे भाग आहे.
आज इतके सारे वैज्ञानिक भ्रष्ट होण्यास आणि एपीएससुध्दा ज्या लाटेत वाहवली आहे त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग स्कॅम आणि त्याला पाठबळ देणारा अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा महापूर. भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मी प्रदीर्घकाळ काम केले आहे, त्यात पाहिलेला असला स्यूडोसायन्टिफिक- (छद्मवैज्ञानिक) बनाव केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणेन. आणि त्याला केवढे प्रचंड यश मिळाले आहे... ज्या कुणाला याबद्दल थोडीजरी शंका असे त्याने मांडी ठोकून क्लायमेटगेटची सर्व कागदपत्रे वाचायलाच हवीत. सारे काही उघड होते. मॉन्टफोर्डच्या पुस्तकात सारे काही संगतवार मांडलेले आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की कोणताही सच्चा भौतिकशास्त्रज्ञ- नव्हे तर कोणताही सच्चा वैज्ञानिक हे वाचून घृणेने भरून जाईल. मी तर वैज्ञानिकांची नवी व्याख्याच या घृणेच्या आधारे करू शकेन.
मग या आव्हानाच्या संदर्भात एपीएसने काय केले आहे? त्यांनी हा भ्रष्टाचार सर्वसाधारण मूल्य म्हणून मान्य करून टाकला आहे. उदाहरणार्थ-
1- साधारण एक वर्षापूर्वी आमच्यपैकी काही जणांनी काही सदस्यांना या विषयावर एक इमेल पाठवली. एपीएसने त्यात छेडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष केले, पण एपीएसच्या अध्यक्षांनी आम्ही हे इमेल पत्ते कुठून मिळवले याची कुटील चौकशी सुरू केली. पूर्वी, एपीएस अशा महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी आपापसात चर्चा करावी म्हणून उत्तेजन देत असे. किंबहुना सोसायटीच्या घटनेत हा एक प्रमुख हेतू मानला गेला आहे. आता नाही. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते चर्चा बंद व्हावी याच दृष्टीने करण्यात आले होते.
2- अनेकांचा विरोध असूनही क्लायमेट चेंजच्या बाजूने जे विधान एपीएसने प्रसृत केले ते अत्यंत घाईघाईने, मोजक्या लोकांना लंचला बोलावून लिहून टाकलेले होते. मी अनेक सदस्यांना ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, अशा एपीएसच्या सदस्यांच्या विचक्षणेचे त्यात कुठेही प्रतिबिंब नाही. त्यातील काही जणांनी कौन्सिलकडे या मतप्रदर्शनाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या मतप्रदर्शनातील एक अगदी (अव)लक्षणीय शब्द होता- विज्ञानाच्या दृष्टीने विषारीच- वादातीत सत्य. हा शब्द भौतिकशास्त्रातील अत्यंत नेमक्या बाबींना लागू होतो. या विषयाला तर नक्कीच नाही. ही मागणी होताच एपीएसने एका गुप्त समितीची स्थापना केली. तिची बैठक कधीच झाली नाही, त्यांनी या भूमिकेच्या विरुध्द असलेल्या स्केप्टिक्सना बोलावून कधीही चर्चा केली नाही- आणि तरीही आधीचे विधान संपूर्णतः योग्य असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या विधानाचा सूर जरा नको इतका तीव्र आहे एवढेच त्यांनी मान्य केले. कुणाचाही आग्रह नसताना वादातीत सत्य हा शब्दही पुराव्यांच्या संदर्भात तसाच ठेवला. अखेरीस, कौन्सिलने संपूर्ण विधान होते तसेच ठेवले केवळ त्यात काही अनिश्चितता असल्याचे नमूद केले आणि मग त्या अनिश्चितता मागे सारून मुख्य विधानाला सरसकट मान्यता देण्यासाठी शब्दबंबाळ स्पष्टीकरणांची भर घातली. ते विधान अजूनही एपीएसची अधिकृत भूमिका म्हणून तसेच विराजमान आहे. त्यात जगभरातील सर्व शासनांना दिलेला सल्ला एपीएसचा बडेजाव माजवणारा आहेच पण गाढवपणाचाही आहे... जणू काही एपीएस म्हणजे कोणी विश्वनियंता आहे- मास्टर ऑफ द युनिव्हर्स. असे नाही... आणि आपली नेते मंडळी असे मानतात याची मला लाजच वाटते. हा काही करमणुकीचा खेळ नाही. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न यात गुंतलेला आहे, वैज्ञानिकांची संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा कसोटीला लागते आहे.
3- आणि मग दरम्यान क्लायमेटगेट घोटाळा बातम्यांतून चव्हाट्यावर आला. प्रमुख भयकंपवाद्यांची कारस्थाने जगापुढे आली. एवढ्या प्रचंड प्रमाणावरचा वैज्ञानिक घोटाळा मी कधी पाहिला नव्हता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. एपीएसच्या भूमिकेवर याच काही परिणाम दिसावा- काहीही नाही. काहीच नाही. हे विज्ञान निश्चितच नाही. काही वेगळ्याच शक्ती यात कार्यरत आहेत.
4- मग आम्ही काही जणांनी या मध्ये थोडा वैज्ञानिक विचार पुन्हा जागवण्याचा प्रयत्न केला... कारण अखेर एपीएसचा कथित आणि ऐतिहासिक हेतू तोच तर आहे. आम्ही आवश्यक त्या- म्हणजे 200 हून अधिक सह्या गोळा केल्या आणि कौन्सिलने क्लायमेट सायन्सवर, त्यातील वैज्ञानिक मुद्द्यावर खुली चर्चा करण्यासाठी टॉपिकल ग्रुप करावा अशा प्रस्ताव ठेवला. यामुळे भौतिकशास्त्रातील खुल्या चर्चेची गौरवशाली परंपरा जपली जणार होती, राष्ट्राच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे योगदान ठरले असते. तुम्ही आम्हाला एपीएसच्या सदस्यांची यादी देण्यास नकार दिल्यामुळे या 200 सह्या गोळा करणं जरा अवघड गेलं हे मी नमूद करू इच्छितो. एपीएसच्या घटनेनुसार सर्व नियमांची परिपूर्ती करून, आमचा हेतू विस्ताराने स्पष्ट करून हा विषय खुल्या चर्चेसाठी यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले.
5- आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, घटना गेली खड्ड्यात, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिलात. त्याऐवजी स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्त्यांच्या जोरावर क्लायमेट चेंज आणि पर्यावरणावरील टॉपिकल ग्रुपमध्ये सदस्यांना किती रस आहे याची पडताळणी करण्याचा तुम्ही सुरुवात केलीत. विषय न देता असा ग्रुप करण्याचा प्रस्ताव करण्यात किती जणांना रस आहे असे तुम्ही विचारलेत. तरीही अनेकांनी होकार दिला.(तुम्ही सेक्सबद्दल विचारणा केली असती तर तुम्हाला अधिकच प्रतिसाद मिळाला असता) अर्थातच पुढे असे काहीही झाले नाही. त्यानंतर तुम्ही पर्यावरणाचा भागच वगळलात आणि आता सारे प्रकरण ठप्प आहे. एखादा साधा वकीलही तुम्हाला सांगेल की विषय स्पष्ट न करता अर्जी भरली आणि नंतर रिकाम्या जागा भरू म्हणून सांगितले तर त्यावर कोणीही सह्या करीत नाही. हे सारे करण्यामागचा तुमचा एकच हेतू होता, तो म्हणजे आमचा प्रस्ताव कौन्सिलपुढे नेण्याची घटनात्मक जबाबदारी टाळणे.
6- आमच्या कायदेशीर विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा टॉपिकल ग्रुप करण्यासाठी आता तुम्ही आणखी एक गुप्त आणि निष्क्रीय समिती स्थापन करून ठेवली आहे.

क्लायमेट चेंजच्या संदर्भात केलेले दावे तावून सुलाखून घेण्याच्या दृष्टीने काहीही गंभीर स्वरूपाची अभ्यस्त चर्चा घडूच नये म्हणून एपीएसच्या व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच हा प्रश्न झुलवत ठेवला आहे. या संघटनेवरील माझा विश्वास उडाला याचे तुला नवल वाटते कां?
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नोंदून ठेवण्याची गरज वाटते, कारण इतरांच्या अंतस्थ हेतूंची चर्चा करण्यात जरा धोकाच असतो. एपीएसमधील ही कारस्थाने इतकी विचित्र वाटतात की त्याचे सरळसोपे स्पष्टीकरण देणे कठीण आहे. कुणी म्हणतात, आजकालचे भौतिकशास्त्रज्ञ पूर्वीच्यांइतके हुषार नाहीत, पण तसे काही मला वाटत नाही. मला वाटते, अर्धशतकापूर्वी आयझेनहॉवरने म्हटल्याप्रमाणे, याचे मूळ कारण पैसा हेच आहे... या विषयात अब्जावधी डॉलर्सच्या सोबतीनेच प्रसिध्दी आणि चकचकाटही आहे. शिवाय सुंदर, निसर्गरम्य बेटांना भेटी देण्याची संधीही या क्लबच्या सदस्यांना सहजच चालून येते. जर ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा अचानक फुटला तर, तू अध्यक्ष असलेला तुझा स्वतःचा भौतिकशास्त्र विभाग वर्षाकाठी काही दशलक्ष डॉलर्सना मुकेल. माइक मानच्या गैरवैज्ञानिक वर्तणुकीला माफी देताना पेनसिल्वेनिया स्टेट विद्यापीठाने किंवा फिल जोन्सला माफ करून टाकणाऱ्या इस्ट अँग्लिया विद्यापीठाने या गोष्टींचा विचार केला असणारच. वेगळा निर्णय घेतला असता तर त्याचा आर्थिक भुर्दंड किती पडला असता याचे त्यांना भान नव्हते थोडेच. जुनी म्हण आहे आपली- वारा कुठल्या दिशेने वाहतो हे कळायला तुम्ही काही हवामानतज्ज्ञ असण्याची गरज नसते.
मी काही तत्वज्ञानी नाही, त्यामुळे आपला बृहद्स्वार्थ साधण्याची आंस आणि भ्रष्टाचार यातील अंतर कुठे ओलांडले जाते याचा काही मी विश्लेषक होऊ शकत नाही, पण क्लायमेटगेटबद्दल जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत ती वाचून एवढे तर निश्चितच स्पष्ट होते की आता या विषयाचे स्वरुप ऍकेडेमिक राहिलेले नाही.
मला यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचे नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार. आशा आहे की आपण अजूनही मित्र आहोत.

हॅल

हे पत्र वाचल्यानंतर, आपल्या जगाची काळजी वाटणाऱ्या, आणि त्या दृष्टीने जबाबदार वर्तन करण्याची गरज वाटणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्रातील सर्वच प्रचाराबाबत बुध्दीच्या निकषांवर विचार करावा अशी इच्छा व्हावी. पैशाच्या महापुरात वाहून जाणे ही भ्रष्टता असेल पण भावनेच्या महापुरात तर्कबुध्दी गमावणे ही त्यापेक्षाही महाग पडणारी चूक ठरू शकेल.

Friday, October 8, 2010

पर्यावरणासाठी पर्यावरण की मानवासाठी पर्यावरण?

जीववैविध्याबद्दल आत्मीयता असायलाच हवी, मित्र हो.
नाझींप्रमाणे आपल्याला निरुपयोगी वाटणाऱ्या किंवा उपद्रवी वाटणाऱ्या जीवांचा सरसकट नाश करण्याचा प्रश्नच नाही. तसे आजवर कोणी सहेतुकपणे केलेलेही नाही.
परंतु काही जण यातही अतिरेक करीत आहेत. उदाहरणार्थ मेरीलँड येथील एका डोंगराच्या माथ्यावर वसलेली एक मानवी वस्ती, त्यांची घरे एका विशिष्ट प्रकारच्या टायगर बीटल्समुळे धोक्यात आली आहेत. हे बीटल्स तेथील कपारी कोरून स्वतःची घरे बांधतात, त्यात अंडी घालतात. त्यामुळे ठिसूळ झालेल्या कपारींची मजबुती करून घेण्यासाठी काही जीववैज्ञानिक विरोध दर्शवत आहेत. कारण त्यामुळे या बीटल्सचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. असल्या संवर्धन प्रयत्नाला माझा विरोध आहे.  येथील घरांचे संवर्धन केले तर ते बीटल्स अगदी जगातूनच नष्ट होतील असेही काही सिध्द झालेले नाही.
पवई तलावातल्या मगरींचा निवास मुंबईतील एकमेव असल्याने तिथून आयआयटी हटवायला हवी असे म्हटले तर...
परंतु, आपले निसर्गप्रेम किती टोक गाठू शकते याचाच सोस वाटू लागला आहे.
केवळ मानवजातीच्याच विकसनामुळे जीवजातींचा नाश होतो आहे असे मानणे हे मूलतः वैज्ञानिक दृष्टीनेच चूक आहे. त्यात अनेक घटकांचा सहभाग असतो.
कित्येक जातींच्या बाबत असे दिसून आले आहे की अलिकडेच ज्या जीवजाती नष्ट झाल्या असे वाटत होते त्या पुन्हा एकदा दिसून आल्या आहेत. डोडोसारख्या पक्ष्याच्या बाबत तसे झाले नाही तरी इतर अनेक बाबतीत तसे दिसले आहे. भावनाप्रधान पर्यावरणवादाचा झेंडा सतत भावनेने भिजलेला ठेवणारे डेव्हिड सुझुकी सतत कुठल्या ना कुठल्यातरी जातीचा ऱ्हास झाल्याची ओरड करीत असतात. गेल्याच वर्षी त्यांनी ब्रिटिश कोलंबियामधून सॉकआय साल्मन मासे नष्ट होत चालले, त्यांची संख्या धोकादायकरित्या घटल्याची बोंबाबोंब केली. पण या वर्षातल्या पहाणीत हा दावा अगदीच फोल असल्याचे लक्षात आले.
ओकापी, उंदरासारखा दिसणारा सोलेनडॉन, ख्रिसमस आयलँडवरचा श्रू, वोनिकोरो वटवाघूळ, टलॉड वटवाघूळ हे प्राणी नष्ट झाले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा दिसण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. हे आणि असे पक्षी-प्राणी-कीटक नष्ट होण्यापासून वाचवलेच पाहिजेत. पण अखेर मानवासाठी इतर सृष्टी की इतर सृष्टीसाठी मानव- कळीचा प्रश्न येतो तेव्हा प्राधान्य कुणाच्या कल्याणाला देणार हा प्रश्न आहे.
आपण पर्यावरणरक्षणाचे जे प्रयत्न करतो त्याचे अंतिम मूल्य हे मानव जातीचे कल्याण, प्रगती, विकास हेच असायला हवे. पण आज अनेक बाबतीत प्रस्थापित जागतिक पर्यावरण रक्षण चळवळ ही केवळ पर्यावरणासाठी पर्यावरण हा हेका चालवते आहे कां असा संशय येतो.
त्यांच्या सभा, परिषदा, मोहीमा, शिष्यवृत्त्या यांची दिशा जैव इंधनांचा वापर रोखणे, अणू ऊर्जा रोखणे, विकासाच्या ज्या ज्या दिशा पत्करून पहिल्या जगाचा आजवर विकास झाला त्या दिशा तिसऱ्या जगासाठी बंद करणे यातच परिणत होते आहे.
तिसऱ्या जगातील अन्न,पाणी, निवारा, आरोग्य या अडचणी निस्तरण्यासाठी आधुनिक विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या उत्तरांचा आधार घेण्यावाचून पर्याय नसताना विकास या संकल्पनाबाबतच साध्यासुध्या लोकांच्या मनात प्रश्नचिन्हे उभी करण्यात धन्यता मानली जात आहे.
जगभरचा पैसा जर मागास राहिलेल्या माणसांच्या जगात पायाभूत सोयीसुविधांसाठी ओतला गेला तर मानवकेंद्री पर्यावरण रक्षण सहजसाध्य आहे. त्यातून संपूर्ण जगाचीच भरभराट होईल.
पण मग काही जणांचे पर्यावरण शौक पुरे करण्यासाठी, त्यांना प्रतिष्ठेच्या जागा मिळण्यासाठी पैसा कुठून बाजूला पडणार...
जागतिक पर्यावरण रक्षण चळवळीचा अमेरिकन देव अल गोर याचे आणि आयपीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पचौरी यांचे बंगले पहा... त्यांचे कार्बन फूटप्रिन्ट पहा...  आणि मग या जागतिक धेंडांची कळकळ मोजा एवढेच म्हणता येईल.

Tuesday, October 5, 2010

आता कास खतरेमें

सातारा जिल्ह्यातील कास येथील पुष्पपठार गेल्या काही वर्षात अचानक खूप पॉप्युलर झाले. त्या आधी काही मोजक्याच निसर्गभ्रमन्ती करणाऱ्यांना त्याची माहिती होती. डिजिटल कॅमेरे, ऑर्कुट, फेसबुक यांच बरोबर वृत्तपत्रांची रंगीत छायाचित्रे छापून पेपर आकर्षक करण्याची गरज यातून कासच्या वेड्यागत फुलणाऱ्या पठाराला भरपूर प्रसिध्दी मिळाली. हे पठार फुलण्याचा काळ जेमतेम महिना सव्वा महिना इतकाच आहे. ही माहिती मिळाल्यावर तिथे जाणारे पर्यटक छोट्याशा कालखंडात मोठ्या संख्येने गेले.
मी स्वतः या वर्षी पंधरा दिवसांच्या गॅपने तिथे दोनदा गेले. दोन्ही वेळा वीकेन्ड असूनही तिथली गर्दी अशी काही वाहवून चालली नव्हती. कर्णकर्कश भोंगे लावून नाच करणारी जनता तिथे पोहोचली नव्हती. पेपरात आलेली माहिती वाचून, फोटो पाहून भुललेले, फुललेल्या बहराचा आनंद घेण्यासाठी, ते सौंदर्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवण्यासाठी वेळात वेळ काढून धावलेले मुंबई-पुण्याकडचे लोक होते ते...
महिन्याभरापूर्वी ज्या लोकांनी कास पठारावर वृत्तपत्रांमधून लेख लिहिले, फोटो पाठवले (त्यासाठी मानधनही मिळतंच) तेच लोक अचानक आता गर्दी होत असल्यामुळे कासचे पुष्पपठार खतरेमें ची बोंब ठोकताना पाहून मजा वाटते. 
अचानक त्यांना कासला काटेरी कुंपण घालण्याची गरज वाटू लागली आहे.
गर्दीला आवर घालण्याची गरज वाटू लागली आहे.
कासचे किंवा अशा कुठल्याही रानोमाळ सौंदर्याचे रक्षण करण्याचे काही मार्ग आहेत. लोकांना फिरण्यासाठी दगडी फरशांच्या पायवाटा करणे, त्यांच्यासाठी काही बेसिक सुविधा पुरविणे हे केले की लोक फुलं कशाला तुडवतील... आपण सोडून बाकी सारे नासधूसच करतील असा ग्रह नको.
आलेल्या पर्यटकांची प्रवेशशुल्कही द्यायची तयारी असते. ते घेऊन शिस्त आणि सुविधा दोन्ही साध्य करता येईल. ते न करता केवळ वृत्तपत्रांतून कास पठार रक्षणाची हाळी देत सर्वसामान्य लोकांना कासचा प्रवेश बंद करून नेमके काय साध्य होणार...  

Monday, October 4, 2010

जीववैविध्याच्या संदर्भात



गेल्या पोस्टवर अरूण इनामदार यांनी जीववैविध्याच्या ऱ्हासाबद्दल कॉमेन्ट केली आहे. मला स्वतःला निसर्गातील जीववैविध्याबद्दल विलक्षण कुतूहल आणि प्रेम आहे. माझ्या बहिःशाल शिक्षण विभागातील अऩेक कार्यक्रमांतून लोकांना आपल्या परिसरातील वनस्पती प्राणी कीटकादी जीववैविध्याची ओळख व्हावी म्हणून मी गेली अनेक वर्षे अनेक कार्यक्रम राबवते आहे, याची आपल्यापैकी काहींना तर निश्चितच जाणीव असेल. हे वैविध्य आपण आपल्या अज्ञानामुळे, गाढवपणामुळे हरपून बसू नये, आपल्या निकटच्या परिसंस्थामध्ये त्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्यासंबंधीची माहिती लोकांना मिळाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो.
या संबंधीचे लोकशिक्षण महत्त्वाचे आहे यात वादच नाही.
प्रश्न येतो तो भयकंपवाद्यांच्या अजेन्डावर जीववैविध्याचा प्रश्न जातो तेव्हा. मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे, कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या उत्सर्जनामुळे अनेक जीवजाति-प्रजाती कायमच्या नष्ट होतील असे जे म्हटले जाते, त्यात किती तथ्य आहे ते तपासून पहायला हवे.
जगभरातील वनस्पती, प्राणी, कीटकांच्या प्रजातींपैकी अनेक जाती क्रेटॅशियस आणि टर्शियरी कालखंडाच्या सीमेवर म्हणजे सुमारे 6 कोटी 50 लक्ष वर्षांपूर्वी नष्ट झाल्या होत्या. यातच डायनॉसॉर प्रजातींचाही नाश झाला होता. आज मानवी हस्तक्षेपामुळे जीवजातींचा ऱ्हास याच प्रमाणात होतो आहे असा एक दावा केला जातो. हा दावा नाट्यमय आहे कारण तो वास्तवापेक्षा अतिशयोक्त आहे.
अशा प्रकारे ऱ्हास खरोखरच होतो आहे कां- या प्रश्नाबरोबरच जो काही ऱ्हास होतो आहे, त्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वावर आणि प्रगतीवर काय परिणाम होतात हे पहाणेही महत्त्वाचे आहे.
गेल्या शतकापासून जीवजातींचा ऱ्हास, विशेषतः कीटक प्रजातींचा ऱ्हास होण्याचा वेग वाढला आहे, हे सरसकट मान्य करण्या अगोदर काही मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे. अनेक कीटक प्रजातींचे भूभाग हे फार मर्यादित असतात. उदाहरणार्थ ऍमेझॉनच्या जंगलात अनेक
कीटक प्रजाती आहेत आणि त्यातील अनेक जाती काही एकर भूभागापुरत्याच मर्यादित असतात. त्यामुळे जंगलाचा एखादा भाग जंगलतोड किंवा अन्य कारणांनी नष्ट झाला की त्यातील काही कीटक जाती नष्ट होतात. पण काही कीटक प्रजाती नष्ट झाल्यामुळे जग नष्ट होत नाही. परिसंस्थेत बदल झाल्यानंतर नव्या प्रजाती उत्पन्न होत रहातात. 6 कोटी 50 लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या जीवऱ्हासानंतर पुन्हा एकदा ही वसुंधरा पुन्हा एकदा जीवसृष्टीने गजबजून गेलीच ना...
पृथ्वीच्या अंतर्गत घडामोडींच्या, सूर्यामधील घडामोडींच्या तालावर निसर्गाचे नर्तन चालते. त्यातूनच तो कधी विक्राळ होतो कधी वत्सल. गेली कोट्यवधी वर्षे हे नित्य घडते आहे. एवढ्या ताकदीसमोर मानवी प्रगतीच्या छोट्याशा तरंगाने जो काही बदल होतो आहे तो फार काही नाही. तरीही आपापल्या कणभर आयुष्यकाळात आपण आपल्या परिसंस्था जशा आहेत तशा न राहू देता आपल्या सोयीनुसार त्यात बदल करतोच. डासांची संपूर्ण प्रजातीच नष्ट झाली, ढेकणांची जात ऱ्हास पावली तर आपल्याला हवेच असेल.  
वनस्पती सृष्टीतील जीववैविध्याबाबत बोलायचे तर ज्या वनस्पतींचा उपयोग माहीत आहे त्या वनस्पतींना माणूस जगवतो. आता जगभरच्या अभ्यासकांना आणि त्यांच्या मार्फत लोकांना हे बऱ्याच अंशी माहीत आहे की आज आपल्याला एखाद्या जीवाचा उपयोग माहीत नसला, तरीही तो पुढे कधीतरी माहीत होईल. निदान तोवर तरी त्या आज निरुपयोगी भासणाऱ्या वनस्पतीला टिकवले पाहिजे. जेनेटिक इंजिनियरिंगच्या विरुध्द बोलणाऱ्यांना हे सांगितले पाहिजे की या शास्त्रांच्या प्रगतीमुळे जीववैविध्याचे महत्त्व उद्योगजगतात अधोरेखित झाले आहे. उत्कृष्ट कोटीतील मानवी बुध्दीमत्ता आज या वैविध्याचा शोध घेते आहे. क्रेग व्हेन्टरची संस्था महासागरातील सूक्ष्मातिसूक्ष्म जीवांचा शोध घेत, नोंदी घेत केवढे मोठे कार्य करते आहे. पण या साऱ्याचा हेतू हा मानवजगताची अधिकाधिक प्रगती करणे, निसर्गाच्या विक्राळपणावर मात करण्यासाठी नवे शोध घेणे हाच आहे आणि असायला हवा.
मानवाने केलेल्या आजवरच्या प्रगतीमुळेच मानवजातीला जीववैविध्याचे अस्तित्व आणि महत्त्व अधिकाधिक कळत चालले आहे. या गोष्टी ज्या औद्योगिक क्रांतीमुळे, जैव इंधनांवर आधारलेल्या प्रगतीमुळे शक्य झाल्या त्यांतून काही प्रमाणात परिसंस्थांमध्ये बदल अवश्य झाला. मानवी जीवनाला, वाढीला उपकारक अशा गोष्टी आपण शोधत गेलो,टिकवत गेलो. ज्या गोष्टी आपल्याला काही काळासाठी धोकादायक किंवा निरुपयोगी वाटत होत्या त्यांच्यावर आपण वार केला. अस्तित्वाच्या लढाईत हे होत राहिले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून आज आपण एका सुखकर जगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. या वेळी जी प्रगती झाली तिच्यावर थुंकण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे. त्या दृष्टीने जीववैविध्य रक्षणाचा कोणी वापर करीत असेल तर ते ही एक नाटकच आहे हे ओळखायला हवे.
 10 ऑक्टोबर 2010 म्हणजे 10-10-10 या तारखेला मानवजातीने आपल्या कार्बन उत्सर्जानात 10 टक्के घट करावी असे एक आवाहन भावनावादी पर्यावरणवाद्यांनी केले आहे.कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या वातावरणाला धोका पोहोचतो हाच मुळात एक खोटा दावा आहे. वनस्पतींचे वैविध्य आणि संख्या ही कार्बन समृध्द वातावरणात फोफावतात हे अनेक अभ्यासकांनी सिध्द केले आहे. 10:10 नावाच्या एका वेबसाईटवर या दहा टक्के कार्बन-कटच्या संदर्भात गेल्या आठवड्यात एक भयंकर मिनीफिल्म टाकण्यात आली होती. यात कार्बन एमिशन कमी करणे आवश्यक आहे असे सांगणारे लोक आपल्याशी सहमत न होणाऱ्या लोकांना एक बटण दाबून उडवून टाकतात. एक शालेय़ शिक्षिका आपल्या वर्गातल्या न ऐकणाऱ्या मुलांना उडवते, त्यांच्या चिंधड्या उडून साऱ्या वर्गावर रक्तमांसाचा सडा पडतो... ती म्हणते नो प्रेशर- असे आणखी चार पाच गट दाखवून त्यातल्या विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना बटण दाबून उडवून टाकलेली रक्तरंजित अभद्र दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
ही म्हणे विनोदी फिल्म होती...
भावनेचे राजकारण करणाऱ्या पर्यावरण चळवळीची मजल कुठवर गेली आहे ते पाहून ठेवा.









Thursday, September 30, 2010

मानवनिर्मित ग्लोबलवॉर्मिंगची हाळी- एक बुध्दीभेद

मध्यंतरी मी लोकसत्तामध्ये ग्लोबल वॉर्मिंग की सत्यापलाप आणि गैरसोयीची असत्ये असे दोन लेख लिहिले होते. त्यावर बऱ्याच उशीराने पण तीन प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. त्यातील एका प्रतिक्रियेला मी उत्तर दिले होते. ते उत्तर प्रसिध्द झाले त्याच्या शेजारीच डॉ. निकित अभ्यंकर यांची माझ्या लेखावरील दुसरी प्रतिक्रियाही प्रसिध्द झाली. डॉ. निकित अभ्यंकर स्टॅनफोर्ड विद्यापीठात आहेत असे त्यांच्या नावाखाली लिहिले होते. ही प्रतिक्रियाही माझ्या भूमिकेला विरोधी होती. शिवाय त्यात मी बड्या उद्योगांबद्दल काहीही बोलत नाही अशी एक शेरेबाजी होती.
याच स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एक एमिरेटस प्राध्यापक डॉ. जॉन मॅकार्थी हे एकंदर प्रगतीची व्यवहार्यता अतिशय प्रभावीपणे, सांख्यिकी आणि विज्ञान यांच्या आधारावर मांडतात, जगबुडीची हाकाटी करणाऱ्यांच्या एकेक प्रतिवादावर अत्यंत शांतपणे उत्तरे देतात. त्याचे लिखाण, दृष्टीकोन अवश्य समजून घेण्यासारखे आहे. जगाच्या सर्वनाशाची विदारक चित्रे मन लावून रंगवणाऱ्यांच्या फौजेपुढे आपली विवेकबुध्दी ठणठणीत ठेवण्यासाठी या आशावादी विचारवंताची मला तरी फार मदत झाली.
डॉ. गिरिधर पाटील गेल्या पोस्टवरील कॉमेन्टमध्ये म्हणतात- पौर्वात्य भोंगळ तत्वज्ञानाचा संबंध कुठे जोडता येतो कां?
अहो भोंगळपणाचे वैशिष्ट्य पौर्वात्यच काय पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांनाही लागू होते. धार्मिकतेतून निर्माण होणारा गूढवाद हा दोन्हीकडे आहे. आणि साम्यवादी विचारसरणीच्या खांद्यावर उभे रहात भांडवलदारी प्रगतीला विरोध करणारे डावे पर्यावरणवादी, समाजवादी म्हणवून घेणारे दिखाऊ लोक काय कमी भोंगळ तत्त्वज्ञानाची गोळी चढवतात?
आपल्याला एक गोष्ट ठामपणे म्हणता येते ती एवढीच की यात एकंदरीत भोंगळपणा भरपूरच आहे.
आज नीरी, एमटीएसयू आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या मुंबई शहरावरील एका अहवालावर प्रचंड मोठ्या मथळ्यातील बातमी छापून आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा दुष्परिणाम मुंबई शहरावर दिसणार असे त्यात म्हटले आहे.
शहरे ही पृथ्वीवरील मृदा थराची बंदी केल्यामुळे उष्णतेची बेटे होतातच. सारखेच हवामान, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि अंतर असलेल्या, इतर कमी लोकसंख्या, कमी इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या ठिकाणांपेक्षा तुलनेने शहरांतील तपमान जास्तच असते.
नथिंग कम्स फ्री... शहरातील सोयी, जगण्याच्या संधी, वाढण्याच्या संधी हे ज्यांना हवंसं आहे ते ही किंमत देतातच. ज्यांना थंडावा, शांतता जास्त प्रिय आहे त्यांना शहर सोडून इतरत्र रहाता येतंच. हा आपापल्या निवडीचा प्रश्न आहे. माणूस हा आपले पर्यावरण आपल्या गरजेनुसार सुधारत रहातो, बदलवीत रहातो. एकदा शहराची गरज आहे म्हटल्यानंतर त्यात सुखकर वातावरण तयार करण्यासाठी आपण काम करतोच. या शहरात अधिक झाडे लावू, श्वासोछ्श्वास करू शकतील असे रस्ते-पायरस्ते करू, प्रत्येक इमारतीच्या छतावर झाडेझुडुपे लावता यावीत अशा तऱ्हेने इमारतींच्या छतांचे बांधकाम करू...
शहरातील वाढत्या उष्णतेवर उपाय शोधणारे काही लोक म्हणतात इमारतींची छपरे प्रकाश परावर्तित करणारी असावीत... काहीजण म्हणतात प्रकाश परावर्तित करणारे पृष्ठभाग असल्यामुळे उष्णता वाढते.
या विषयावर उलटसुलट चर्चा व्हावी, शास्त्रीय निरिक्षणे घेतली जावीत आणि मग योग्य काय ते ठरवता येईल.
पण नाही, ज्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आरोळी ठोकण्यावर अवलंबून असतो ते सगळे गब्रू पर्यावरणवादी कुठल्याही इश्यूचं कोलीत घेऊन धावत सुटतात. ज्यांना पत्रकारितेत आपली प्रतिमा विशिष्ट प्रकारे घडवून लॉबी चालवायची असते ते त्यांना आणि त्यांच्या इश्यूच्या कोलिताला उंच नेतात.
काही वर्षांपूर्वी मी विद्यापीठात- म्हणजे बहिःशाल शिक्षण विभागात, पर्यावरण आणि विकास अभ्यासक्रम सुरू केला. 1996-97 या वर्षात हा अभ्यासक्रम आखला तेव्हा प्रा. डॉ. एस्. बी. चाफेकर यांनी प्रथमच स्पष्ट केले होते की आपल्याला भयकंपवादी म्हणजे अलार्मिस्ट भूमिका घेऊन पर्यावरण-रक्षणाचा विचार करायचा नाही. आपला परिसर, आपली परिसंस्था सुंदर आणि सुदृढ रहाण्यासाठी असला टोकाचा थयथयाट करण्याची गरज नाही. विशेषतः मुंबई शहर हे शहर आहे, त्याच्या गरजांनुसार त्यातील नैसर्गिक परिसंस्थांचे रक्षण कितपत होते यावर एक मर्यादा येते. यादृष्टीने आपण संतुलित विचार मांडणे आवश्यक आहे.
त्यावेळीही मी म्हटल्याप्रमाणे एक कोलीत-बहाद्दर पर्यावरणवादी होते डॉ. रश्मी मयूर. एकदम इंटरनॅशनल माणूस. (आमच्या विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंनी अभ्यासक्रमाच्या आखणीत त्यांना स्थान द्यावे असा आग्रह धरला. जे साध्य करायचे त्यालाच मुळात फांदा मिळाला असता, त्यामुळे तो आग्रह मी जुमानला नव्हता.) साऱ्या पेपरांत एकदम प्रसिद्ध. गेले बिचारे आता. पण त्यांनी मळवलेली पायवाट आता राजमार्ग झाली आहे. फौज वाढली आहे.
दक्षिण मुंबईतले एक साजरं मासिक काढणारे पर्यावरणप्रेमी-वादी आहेत. त्यांच्या तीन कार्स आहेत. एक स्वतःला, एक बायकोला, एक मुलाला... आता यात वावगं काय... काहीच नाही. स्वतःच्या क्षमतेने तुम्ही पैसा कमावला असेल आणि त्यातून तुम्ही तुमच्या सुखकर प्रवासासाठी खर्च केलात तर त्यात वावगं काहीही नाही. पण हे महाशय इतर सर्वांना पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करण्याचा, कार-पूल करून वापरण्याचा सल्ला देतात एवढंच वावगं. दुसरे एक मध्य मुंबईतील वीर  मराठी पत्रकारांचे लाडके झालेत. अणू-ऊर्जा ते सागरी लिंक, ते डहाणूचा कारखाना ते प्रकाश परावर्तित करणाऱ्या काचा ते- अर्थातच ग्लोबल वॉर्मिंग सगळ्यावर ते आग पाखड करतात. आणि आपला प्रो-पर्यावरण-फेशनॅलिझम त्यांना आनंदाने वाव देतो.
या साऱ्यामध्ये खरोखरच गाभा आहे तो तत्वज्ञानात्मक गोंधळाचा,  मर्यादित विचारांतून आलेल्या नैतिकतेच्या भोंगळपणाचा. आणि त्याला फूग आली आहे ती या सर्व प्रश्नांमधल्या आर्थिक संधी वाढत गेल्यामुळे, प्रतिष्ठा लाभली आहे ती या निमित्ताने अभ्यासाच्या काही विषयांना वाव मिळून त्यातील पैसा वाढत गेल्यामुळे.
मी आणि माझे अनेक सहकारी गेल्या वीस वर्षांपासून जीववैविध्याचे महत्त्व, वनसंवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना दृष्टी देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम घेत आलो आहोत. पण मानवाच्या विकासामुळे पृथ्वीचे भवितव्य धोक्यात आल्याची हाळी ना आम्हाला कधी पटली ना तिचा वापर करून आम्ही फंड्स मिळवले.
भारतासारख्या देशात तंत्रज्ञान अजूनही लोकांपर्यंत पुरेसे पोहोचले नाही, कल्याणकारी तंत्रविज्ञानात्मक प्रगती इथल्या इथे विकसित झालेली नाही. सकस अन्न आणि स्वच्छ पाणी, जीवनमान सुधारेल इतकी ऊर्जा इथे अनेक लोकांना उपलब्ध नाही. युरोपात पुरेशी समृध्दी आल्यानंतर तिथल्या लोकांनी औद्योगीकरणाच्या नावाने बोंब ठोकणे त्यांना परवडू शकते.  उद्योग किंवा विकास, अणूऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, नवीन बियाणांचा वापर, म्हणजे निसर्गाला गिळणारा राक्षस ठरवून इथल्या लोकांचा बुध्दीभेद करण्याने इथल्या केवळ स्वतःलाच पर्यावरणवादी मानणाऱ्या लोकांना फेलोशिप्स मिळतील, आंतरराष्ट्रीय निधीतून संमेलनांची आमंत्रणे मिळतील, लढाऊ कार्यकर्ते,  झुंजार पत्रकार म्हणून मर्यादित वर्तुळांत मान्यता मिळेल. पण- इथल्या मागास शेतीने पिचलेला शेतकरी, गावात पुरेशी ऊर्जा नाही म्हणून शिक्षण नाही, रोजगार नाही, प्रगती नाही म्हणून जमीन सोडून जाणारे त्याचे लेक-लेकी, या हिणकस प्रचाराची अंतिम बळी ठरतील याचे भान त्यांना असेल?

Tuesday, September 28, 2010

प्रज्ञेच्या अधिक्षेपाविरुध्द

रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह हे आयन रँडचं एक पुस्तक आहे. पर्यावरणवादी चळवळीची नुकतीच सुरुवात झाली होती त्यावेळी आयन रँडने आपल्या इहवादी, वस्तुनिष्ठ, व्यक्तीवादी, भांडवलवादी तत्वज्ञानाच्या अंगाने या विषयावर भाष्य केलं होतं. सध्या मी जे पर्यावरण क्षेत्रातील काही विषयांवर लिहिते आहे त्या दृष्टीनेच हा ब्लॉग सुरू केला आहे.
पर्यावरण रक्षणाबद्दलचा केवळ भावनिक विचार करणाऱ्या चळवळींच्या बाबत त्यांना पुन्हा एकदा मानवाला आदिमतेकडे नेण्यातच जास्त रस आहे की काय असा प्रश्न पडतो. विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान याची फळे स्वतः चाखताना त्यांना काही विशिष्ट मर्यादेवर हा विकास थांबवावा असे वाटते हे तर स्पष्टच आहे. अनेकांना असे वाटते की निसर्गावर प्रेम म्हणजे प्रगतीला विरोध, विकासाला विरोध हा केलाच पाहिजे. आज  ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज मानव निर्मित आहे हे मान्य करणे ही तर परवलीची भूमिका झाली आहे. ही भूमिका घेतली की अनेक दरवाजे उघडतात.
हल्ली शाळा कॉलेजांत विज्ञान प्रदर्शने किंवा आपण आपली जबाबदार नागरिकाची भूमिका निभावतो आहोत हे दाखवण्यासाठी मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची हाकाटी छान सजवून मांडली जाते. विशेषतः लहान मुलांना तर हे अगदी मस्तच पटलेलं आहे. अर्थात या पातळीवर असं काही करत रहाणाऱ्या सर्वांना केवळ प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनपुरती मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगची कळकळ रहाते हे एका दृष्टीने बरंय. मात्र जगभरात या हाकाटीच्या छटा फार वेगवेगळ्या आहेत. अल गोर, पचौरी वगैरेंच्या पठडीतल्या लोकांना या हाकाटीमुळे पैसा आणि प्रसिध्दीच्याबरोबरच सत्तालाभही झाला आहे. पण काही भाबडे लोक मात्र या मोहात न सापडता खरोखरच ग्लोबल वॉर्मिंगला मानवनिर्मित कारखानदारी, ऊर्जेचा वापर, इंधन वापर या गोष्टी जबाबदार आहेत असे मानून जगाचा दृष्टीकोन बदलायला निघाले आहेत. कार्बन फूटप्रिन्टचे गणित ताळा-पडताळा न करताच स्वीकारून जगाची भांडवलदारी पध्दतीने होत गेलेली प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करणारे डावे, पर्यायी विकासनीतीचा स्वप्नलोक रंगवणारे कार्यकर्ते लक्षावधी आहेत. संपूर्ण जगाची सत्तासूत्रे एकवटून आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करणारे व्हाईट मेल सुप्रिमसीचे पुरस्कर्तेच यांच्या खांद्यावर बसून अखेर ही विसंगतींनी भरलेली लढाई जिंकून जातील की काय...
विकासाचे मार्ग बदलण्याचे प्रयत्न करताकरता दारिद्र्याचा, दुःखकष्टांचाच मार्ग वाढत्या लोकसंख्येसाठी खुला होणार आहे. तेल नको, अणु ऊर्जा नको, जेनेटिकली मोडिफाईड अन्न नको, प्राण्यांवर प्रयोग करून मिळवलेली औषधे नकोत...
सारे कसे नैसर्गिक हवे. मानवनिर्मित, कृत्रिम असे सारे काही त्याज्य
मानवी प्रगतीच्या प्राथमिक टप्प्यांतले सुंदर( ) जग... स्वप्नलोक...
आदिम जीवनपध्दतीतील साधेपणा, मध्ययुगीन कलात्मकता, अंगमेहनतीचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनपध्दती... या सर्व गोष्टींचे उदात्तीकरण करण्याचे भरधाव प्रयत्न अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था करीत आहेत.
आदिमांचे पुनरागमन करण्याचा हा जागतिक प्रयत्न मान्य नसलेले वैज्ञानिक, विचारवंतही अनेक आहेत. बहुतांश लोकही या प्रयत्नांना केवल मौखिक पाठिंबाच देतात. प्रत्यक्षात साऱ्या मानवनिर्मित सुखसुविधा सर्वांना हव्याच असतात.
मात्र एक गोष्ट यात वाईट होते ती म्हणजे बौध्दिक दुविधा. तुम्ही कपडे घालता पण नागड्या बाबाची पूजा करता. तुम्हाला सकस अन्न हवे असते पण उष्टावळी वेचून जगणाऱ्याला तुम्ही परमपद देता, तुम्हाला कॉम्प्युटरवरून नेटवरचे सारे काही हवे असते पण इहलोकीच्या पलिकडच्या काल्पनिकतेची तुम्ही मंदिरे बांधता.
तुम्हाला शरीराच्या सर्व भुका भागवायच्या असतात, पण तसे न करणाऱ्यांपुढे तुम्ही हात जोडता. अन्न, सेक्स, मौज, यश, ज्ञान या साऱ्या मानवी बुध्दीच्याच गरजा आहेत. त्यांना भागवण्यासाठी तुमची धडपड चालते, पण त्यांना मिथ्थ्या ठरवणे हे तुम्ही संतपदाचे लक्षण ठरवता.
आपली प्रगतबुध्दी मिथ्थ्या ठरवण्याचा हा सापळा कधीतरी नकळत आपल्या पुढे पडणाऱ्या पावलांना अडवू शकतो. अशा व्यक्तींची उदाहरणे तर दिसतातच, पण संपूर्ण समाजच, संपूर्ण जागतिक समाजच त्या सापळ्यात अडकायला नको.
म्हणून आदिमांचे पुनरागमन- रिटर्न ऑफ द प्रिमिटिव्ह- रोखायला हवे.
या प्रयत्नाचा भाग म्हणून मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगच्या कल्पनेच्या विरुध्द, जेनेटिकली मोडिफाईड बीजांच्या विरोधी प्रचारा विरुध्द, अणू ऊर्जेच्या विरुध्द रान उठवणाऱ्यांच्या विरुध्द, आध्यात्मिकतेच्या नावाखाली इहलोकाला तुच्छ ठरवणारांच्या विरुध्द, प्रगतीला चंगळवाद ठरवून  विवेकनिष्ठेलाच आव्हान देणाऱ्यांविरुध्द, आदिमयुगात जाण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान युगाला बदनाम करणाऱ्यांविरुध्द, बुध्दीपेक्षा भावना श्रेष्ठ ठरवून गूढवाद जोपासणाऱ्यांविरुध्द आणि एकंदरीतच  मानवी प्रज्ञेच्या तेजाचा अधिक्षेप करणाऱ्या विचारसरणींविरुध्द मी लिहिणार आहे.
उच्च स्थानी आसनस्थ झालेल्या बकवासाच्या  चिंध्या उडवण्यासाठी मीही लिहिणार आहे.